अध्याय २ रा.—पापी मनुष्याला ख्रिस्ताची आवश्यकता
मनुष्याला प्रथमत: उत्तम मानसिक सामर्थ्य व मनाची समता हीं दिलेली होती. तो आपल्या स्वरूपांत पूर्ण असून ईश्वराशी मिळून होता. त्याचे विचार शुद्ध व अंतिम हेतु पवित्र होते. परंतु आज्ञाभंगामुळें त्याचें सामर्थ्य नष्ट होऊन त्याजमधील प्रेमाची जागा आपलपोटेपणानें पटकाविली. ईश्वराच्या आज्ञेच्या उल्लंघनामुळें तो इतका दुर्बळ झाला कीं त्यास आपल्या स्वतांच्या सामर्थ्यानें दुष्टाच्या सामर्थ्याला प्रतिकार करणें दुरापास्त झालें. सैतानानें त्यास बंदिवान करुन टाकिलें, व बहुधा ईश्वर मध्यें पडला नसता, तर त्यास अशा स्थितींत कायमचेंच रहावें लागलें असतें. मनुष्याच्या उत्पत्तीसंबंधीं ईश्वरीसंकेत उलथून पाडून पृथ्वी दु:खमय व ओसाड करण्याचा, व हें सर्व परमेश्वराच्या-मनुष्यप्राणी निर्माण करण्याच्या-कृतीचें फळ आहे हें दाखविण्याचा त्या मोहांत पाडणार्या (सैताना) चा इरादा होता.WG 12.1
मनुष्य आपल्या निष्पाप अशा स्थितींत “ज्यामध्यें ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्तनिधी आहेत” अशा ईश्वराशीं आनंदमय दळणवळण ठेवीत असे. परंतु त्यानें पाप केल्यावर पवित्रपणांत त्यांस आनंद लाभेनासा झाला, व ईश्वराच्या समक्षतेपासून दूर राहण्याचा तो प्रयत्न करूं लागला. न पालटलेल्या अंत:करणाची अद्यापपर्यंत अशीच स्थिती आहे. त्याची परमेश्वराशीं एकतानता नसून त्याच्याबरोबर दळणवळण ठेवण्यांत त्याला आनंद होत नाहीं. ईश्वराच्या समक्षतेपासून पापी मनुष्याला सुख मिळत नाहीं. पवित्र व्यक्तींच्या संगतीपासून तो दूर दूर पळतो. स्वर्गांत जाण्यास जरी त्याला मोकळीक मिळाली, तरी देखील त्यापासून त्याला आनंद होणार नाहीं. त्याचे विचार, त्याचे हितसंबंध, त्याचे हेतु तेथील रहिवाश्यांना प्रेरीत करणार्या, विचारांना, हितसंबंधांना, व हेतूंना विरुद्ध असणार. स्वर्गीय गायनांत तो म्हणजे एक बेसुरासारखाच ठरणार. स्वर्ग म्हणजे त्याला एक यातनांचें स्थानच वाटेल. ईश्वर जो त्या स्वर्गाचा प्रकाश व त्याच्या आनंदाचें केंद्र त्यापासून दूर राहण्याची तो इच्छा करील. दुष्ट मनुष्यें स्वर्गसुखाला आंचवतात तें कांहीं ईश्वरी शिक्षेच्या अंमलबजावणीच्या जुलमी आज्ञेमुळें नव्हें, तर ते (दुष्ट मनुष्य) त्याच्या सहवासास नालायक ठरल्यामुळें आंचवतात. देवाचें वैभव म्हणजे त्यांस भस्म करणार्या अग्नीप्रमाणें वाटत असतें. जो त्यांच्या तारणासाठीं मरण पावला त्याजपासून दूर रहावें म्हणून ते नाशाचें स्वागत करितात.WG 13.1
ज्या पापदरींत आपण मग्न झालों आहों तींतून आपल्या आपण बाहेर येणें आपणां मानवांस अशक्य आहे. आपलीं अंत:करणें दुष्ट असून तीं आपणांस बदलतां येणें शक्य नाहीं “मलिनांतून स्वच्छ पदार्थ कोण काढील? कोणीहि नाहीं.” “दैहिक चिंतन हें देवाशीं वैर आहे. कारण तें देवाच्या नियमशास्त्राच्या आधीन नाहीं, आणि त्याच्यानें तसें होववत नाहीं.” शिक्षा, सुधारणा, निश्चयशक्ति व मानवी प्रयत्न यांस योग्य अशी त्यांची मर्यादा आहे, परंतु ह्या बाबतींत तीं अगदीं दुर्बळ असतात. शीलाचें बाह्यांग तीं सुधारतील, परंतु त्याच्यानें अंत:करणांत पालट होणार नाहीं, व जीवनाच्या झर्याचें शुद्धिकरण होणार नाहीं. मनुष्यें पापातून मुक्त होऊन त्यांचें अंगीं पवित्रपणा येण्यापूर्वीपासूनच त्यांचे अंत:करणांत एक प्रकारचें सामर्थ्य क्रिया करीत असावें लागतें व वरून नवीन जीवन सुरू हावें लागतें. हें सामर्थ्य म्हणजे ख्रिस्त होय. त्याच्या कृपेनें निर्जीव प्राणशक्तींस गती मिळून त्या परमेश्वराकडे वळतात. प्रभूनें म्हटलें आहे “नव्यानें जन्मल्याशिवाय” -- नवें अंत:करण, नव्या इच्छा, नवीं कार्ये, नवे हेतु हीं त्यांस प्राप्त झाल्याशिवाय- “त्याच्यानें देवाचें राज्य पाहवत नाहीं.” मनुष्याच्याठायीं स्वभावत: जें चांगुलपण असेल तें पूर्णावस्थेत आलें म्हणजे झालें ही कल्पना घातक व भ्रामक होय. “दैहिक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाहीं, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटत असतात; आणि त्याच्यानें त्या जाणवत नाहींत, कारण यांची पारख आत्म्याच्या योगानें होते.” “तुम्हांस नव्यानें जन्मलें पाहिजे हें मीं तुला सांगितलें म्हणून आश्चर्य मानूं नको.” ख्रिस्ताविषयीं असें लिहिलें आहे, की “त्यांत जीवन होतें, व तें जीवन मनुष्यांचा प्रकाश होतें.” जेणेंकरुन आमचें तारण व्हावयाचें असें फक्त एकच नांव आकाशाखालीं मनुष्यांमध्यें दिलेलें आहे.WG 14.1
ईश्वराचा प्रेमयुक्त दयाळूपणा जाणणें, व त्याच्या स्वभावांतील उपकारशीलत्व व पितृवात्सल्य हीं लक्षांत घेणें इतकेंच पुरेसें नाही, त्याचप्रमाणें त्याचे नियमशास्त्रांत दिसून येणारीं न्यायीपणा व दूरदृष्टीं हीं ओळखणें व तें नियमशास्त्र प्रेमाच्या त्रिकालाबाधित सिद्धांताच्या पायावर रचलेलें आहे हें समजणें इतकेंच पुरेसें नाहीं. “नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमत्ती देतों.” “नियमशास्त्र पवित्र आणि आज्ञा पवित्र यथान्याय व उत्तम आहे.” ह्याप्रमाणें उद्गार काढीत असतांना प्रेषित पौलाला हें सारें कळत होतें परंतु भयंकर आत्मिक यातनांनीं व निराशेचें तो पुढें म्हणाला “मी तर दैहिक व पापाला विकलेला असा आहें.” पवित्रपणाची व न्यायीपणाची इच्छा त्यानें धरिली, परंतु ती आपल्याआपण मिळविण्यास तो अगदीं असमर्थ होता, म्हणून मोठ्यानें ओरडून तो म्हणतो “काय मी कष्टी मनुष्य ! मला वा मरणाच्या देहांतून कोण सोडवील ?” सर्वकाळीं व सर्व देशांत कष्टी झालेल्या अंत:करणांतून अशीच आरोळी निघालेली आहे. ह्या आरिळींचें सर्वत्रांना एकच उत्तर आहे व तें हें कीं “पाहा जगाचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा !”WG 14.2
ईश्वराच्या आत्म्यानें ह्याच्या सत्यपणाच्या स्पष्टीकरणासाठीं व पापाच्या ओझ्यापासून मुक्त होण्याची इच्छा करणार्या आत्म्यांस समजण्यास सोपें करून दाखविण्यासाठीं योजलेले बरेच अलंकारिक दाखले आहेत. एसावाला फसविण्याचें काम केल्यानंतर जेव्हां याकोब आपल्या बापाच्या घरुन पळून गेला, तेव्हां कृतपापाच्या जाणिवेमुळें तो अगदीं कष्टी होऊन गेला होता. एकटा व निराश्रित असा जरी तो होता, व ज्यांच्यायोगानें जीवनक्रम सुखावह होतो अशा सर्व गोष्टींला जरी तो मुकला होता तरी स्वर्गसुखाला आपण मुकलों आहों व पापामुळें आपली ईश्वरापासून ताटातूट झाली आहे, ह्या सर्व गोष्टींहून श्रेष्ठ अशा एका विचाराचें त्याच्या आत्म्यावर प्राबल्य होतें. सभोंवार भयाण टेंकड्या व वरतीं तार्यानें प्रकाशलेलें आकाश अशा ठिकाणीं उघड्या जमिनीवर कष्टी अंत:करणानें तो विश्रांति घेण्यासाठीं पडला. तो निजला असतां एक विलक्षण उजेड त्यास दिसला; आणि आश्चर्याची गोष्ट ही, कीं ज्या माळ जमिनीवर तो निजला होता त्या जमिनीवरुनच विस्तीर्ण छायाकृति व स्वर्गाच्या दरवाजापर्यंत जाणार्या पायर्या, व त्यावरून देवदूत खालींवर जात येत आहेत, असें त्यांस दिसलें व वैभवयुक्त स्वर्गातून सुखाच्या व आशेच्या निरोपाचा दैवी शब्द त्याच्या कानीं पडला. ज्याच्या योगानें याकोबाच्या गरजा व त्याच्या आत्म्याच्या इच्छा भागल्या त्या तारकाची त्यास अशा रीतीनें माहीति झालीं. ज्याच्यायोगानें त्याच्यासारख्या पापी मनुष्याचें ईश्वराशीं पुन्हा दळणवळण सुरू झालें, असा त्यास प्रगट केलेला मार्ग त्यानें आनंदानें व कृतज्ञता बुद्धीनें पाहिला. त्याच्या स्वप्नांतील शिंडी एक गुढच होतें; तिनें, येशु हाच काय तो ईश्वर व मनुष्य यांजमधील दळणवळणाचा मार्ग आहे हें दर्शविलें आहे.WG 15.1
आपल्या नथानेलबरोबर झालेल्या संभाषणांत ख्रिस्तानें ज्या अलंकाराचा उल्लेख केला होता, तो हाच होय. तो नथानेलला म्हणाला “आकाश उघडलेलें आणि देवाच्या दूतांस चढतां व मनुष्याच्या पुत्रावर उतरतां पहाल.” मनुष्यानें पतित होऊन ईश्वरापासून आपणाला दूर केलें, व यामुळेंच पृथ्वी स्वर्गापासून निराळी झालीं. या दोहोंच्या दरम्यान झालेल्या आवर्त प्रदेशामुळें एकमेकांमधील दळणवळण अशक्य झालें. परंतु ख्रिस्तद्वारां पृथ्वी व स्वर्ग हीं पुन्हा जोडलीं गेलीं. सेवा करणार्या देवदूतांस मनुष्यांशीं दळणवळण ठेवतां यावें म्हणून पापांमुळें झालेल्या ह्या आवर्त प्रदेशावर ख्रिस्तानें आपल्या पुण्यानें सेतु बांधिला आहे. पतित मनुष्याला त्याच्या अशक्त व निराश्रित स्थितींत ख्रिस्त हा अनंतशक्तीचें मूळ जो ईश्वर त्याची जोड करून देतो.WG 16.1
पतित मनुष्यांस उद्धरण्याच्या आशेचे व मदतीचे मुख्य मार्गाचा विचार न करितां त्याच्या सुधारणेसंबंधीं मनोरथ व त्यांच्या उद्धाराविषयीं मनुष्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ होत. “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान.” हीं ईश्वराकडून आहेत. शीलाची खरीखुरी उत्कृष्टता त्या व्यतिरिक्त नाहीं; व ईश्वराकडे जाण्याचा ख्रिस्त हा एकच मार्ग आहे. तो म्हणतो, “मार्ग, सत्य व जीवन मी आहें.”WG 16.2
ईश्वराचें अंत:करण त्याच्या पृथ्वीवरील लेकरांबद्दल मृत्युपेक्षां जिचें अधिक सामर्थ्य आहे अशा प्रीतीनें कळवळत आहे. आपल्या पुय्ताला देऊन त्या एकाच देणगींत त्यानें सर्व स्वर्गाचीच आपणांवर वृष्टी केली आहे. त्या तारणाराचें जिणें, त्याचे मरण, त्याची मध्यस्थी, देवदूताम्ची सेवा, पवित्र आत्म्याचें व ईश्वराचें अंतर्बाह्य चाललेलें कार्य व स्वर्गांतील प्राण्यांची सतत कळकळ, या सर्व गोष्टी मनुष्यांच्या तारणासाठीं योजलेल्या आहेत.WG 17.1
आपणांसाठीं केलेल्या त्या जीवयज्ञाचें आपण चिंतन करूं या ! नष्टप्राय मनुष्यांचा पुन्हा स्वीकार करून त्यांस बापाच्या घरीं परत आणण्यासाठीं जे श्रम व जी उत्सुकता खर्ची पडत आहेत त्यांचें मोल समजून घेऊं या ! ह्यापेक्षां अधिक दृढ हेतु व अधिक सामर्थ्यवान साधनें कोणी कधीही उपयोगांत आणूं शकला नसता. सत्कृत्याबद्दल अति मोठें बक्षीस, स्वर्गसुखाचा उपयोग, देवदूतांचा समागम, ईश्वर व त्याचा पुत्र यांचें प्रेम व त्यांशीं दळणवळण, उच्चत्वाचें व अधिक उद्दीपक व उत्तेजक नाहींत काय ?WG 17.2
आणि उलटपक्षीं पापाविरुद्ध सांगितलेले देवाचे न्याय, व अपरिहार्य शासन, आपल्या शीलाची नीचावस्था व अखेरचा नाश हीं सैतानाची सेवा न करण्याबद्दल आपण सावध रहाण्यासाठीं ताकिदीदाखल देवाच्या वचनांत सांगितलीं आहेत.WG 17.3
ईश्वराच्या दयेला आपण मान देऊं नये काय? ह्यापेक्षां तो अधिक काय करूं शकणार? जो आपणांवर आश्चर्यकारक रीतीनें प्रेम करतो त्याच्याशीं आपण योग्य सबंध ठेवून राहूं या ! त्याच्या सादृश्यांत राहण्यासाठीं, सेवा करणार्या देवदूतांची संगति लाभण्यासाठीं, व बाप व पुत्र यांशी एकतानता व दळणवळण प्राप्त होण्यासाठीं जीं साधनें आपणांला दिलीं आहेत, त्यांचा आपण उपयोग करूं या !WG 17.4